राम आणि बुद्ध: त्यागाचा वनवास की आत्मशोधाचा प्रवास?

"चांगले मित्र असतील, तर तुमचा विचार अधिक समृध्द आणि विकास सर्वांगीण होतो." असाच एक मित्र, जो नेहमी वेगळ्या वाटा सुचवत असतो, त्याने एक भन्नाट कल्पना सांगितली. तो म्हणाला—

"रामाला वनवास हा सीता व लक्ष्मण सोबत होते म्हणून वनवास वाटला. ते सोबत नसते, तर रामाला तो बुद्धासारखा वाटला असता. बुद्ध 10,000 वर्षं आधीच मिळाला असता…!"

काय अद्भुत आणि खोल विचार आहे!

हा विचार ऐकताच मनात अनेक प्रश्न उमटले. राम आणि बुद्ध—एकाने कर्तव्याचा मार्ग पत्करला, तर दुसऱ्याने वैराग्याचा. पण रामाचा प्रवास एकटा असता, तर तो त्यागाच्या मर्यादेपलीकडे जाऊन आत्मशोधाच्या वाटेवर गेला असता का?

हा विचार मनात रुजला, पण…

मी अनेकदा या विषयावर लिहिण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी काहीतरी राहून गेल्यासारखं वाटायचं. माझ्या मनात एक प्रश्न नेहमी येत राहायचा—"आपल्यात इतकी वैचारिक परिपक्वता आहे का?"

आणि त्यामुळे कित्येकदा लिखाण अर्धवट राहायचं. पण आज, तेच सगळे अर्धवट विचार पुन्हा वाचताना…त्यांना माझ्या भाषेत मांडायचं ठरवलं.

हा फक्त एक विचार आहे…कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.

आपण एकमेकांच्या विचारांशी सहमत असू असे नाही, पण…तुमच्या भावना आणि तुमचे विचार नक्कीच माझ्याशी शेअर करा. कारण संवाद हा विचारांना दिशा देतो.

**********


राम आणि बुद्ध: त्यागाचा वनवास की आत्मशोधाचा प्रवास?

          राम आणि बुद्ध—दोन महान विभूती, ज्यांनी जीवनाच्या दोन वेगळ्या वाटा निवडल्या. रामाचा वनवास त्यागासाठी होता, तर बुद्धाचा वनवास आत्मशोधासाठी. दोघेही सत्याच्या मार्गावर होते, पण एका प्रवासाचा आधार कर्तव्य आणि समर्पण होता, तर दुसऱ्याचा आधार वैराग्य आणि आत्मशोध.

         पण विचार करा—जर रामाचा वनवास सीतेशिवाय आणि लक्ष्मणाशिवाय एकट्याने भोगावा लागला असता, तर त्याने बुद्धासारखा आत्मशोधाचा मार्ग पत्करला असता का?

        हा विचार पौराणिक संदर्भ आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिला, तर त्याग आणि आत्मशोध यामधील संघर्ष आणि समन्वयाचा गूढ प्रवास उलगडतो.

        रामाचा वनवास म्हणजे- कर्तव्याच्या मर्यादेतला त्याग होय. रामायणात रामाचा वनवास कर्तव्याची पराकाष्ठा आणि त्यागाचं मूर्त स्वरूप आहे. दशरथाच्या वचनपालनासाठी रामाने सुखसंपन्न अयोध्या सोडली आणि चौदा वर्षे वनवास पत्करला. पण हा वनवास सीता आणि लक्ष्मणाच्या सोबतीत होता.

          सीता—समर्पणाची मूर्ती, आणि लक्ष्मण—निष्ठेचं प्रतीक. या दोघांच्या सहवासामुळे रामाचा वनवास त्यागाचा प्रवास बनला, आत्मशोधाचा नव्हे. रामाच्या मनात कधीच स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न नव्हता. त्याच्यासाठी कर्तव्य आणि धर्माचं पालन हेच सत्य होतं.

           अरण्यकांडात रामाने जबरदस्त अंतर्मुखता अनुभवली. पंचवटीत सीता हरणानंतर रामाने पहिल्यांदाच स्वतःच्या पराभवाचा आणि शोकाचा स्वीकार केला.

            "न मे जीवितेनार्थो न च मे लोभया सुखम्।" — सीता वियोगानंतर राम म्हणतो, “ना मला आता या जीविताचा मोह आहे, ना सुखाची आस आहे.”

            सीतेचा वियोग रामासाठी कर्तव्य आणि प्रेम यांच्यातील द्वंद्वाची वेळ होती. पण सीता नसती, लक्ष्मणाची साथ नसती, तर रामाचा वनवास त्यागाच्या मर्यादेपलीकडे जाऊन आत्मशोधाचा प्रवास झाला असता असाही एक विचार करावासा वाटतो.

             बुद्धाचा वनवास हा वैराग्यातून आत्मशोधाचा प्रवास ठरला. सिद्धार्थने राजवैभवाचा त्याग केला, पण तो त्याग कर्तव्यापेक्षा आत्मशोधासाठी होता. त्याला दुःखाचं मूळ समजून घ्यायचं होतं, जीवनाच्या रहस्याचा शोध घ्यायचा होता. बुद्धाचा वनवास हा एकाकी, वैराग्याने प्रेरित आणि ज्ञानाच्या शोधाने वेढलेला होता.

            बुद्धाने गृहत्याग केल्यावर प्रथम आलार कलाम आणि उद्दक रामपुत्त यांच्याकडून ध्यान धारणा शिकली. पण त्याला तेही अपूर्ण वाटले. सात वर्षे तपश्चर्या करूनही समाधान न लाभल्यावर, सिद्धार्थने शेवटी बोधीवृक्षाखाली ध्यानस्थ बसून आत्मशोधाचा मार्ग पत्करला.

            "अत्त दीपो भव"—स्वतःच प्रकाश बनून मार्ग शोधायचा हा संदेश बुद्धाने स्वतःच्या जीवनातून दिला. सिद्धार्थाने सुख, दुःख, मोह आणि बंधनं ओलांडून आत्मशोधाचा मार्ग धरला.

             राम एकटा असता, तर…? सीता आणि लक्ष्मणाची साथ नसती, तर रामाचा प्रवास वेगळा झाला असता का? रामाच्या मनात कदाचित कर्तव्य आणि त्यागाच्या पलीकडे स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला असता. एकट्या वनवासात, कदाचित रामाला त्यागाच्या पुढे जाऊन आत्मशोधाची वाट सापडली असती.

             रामायणाच्या उत्तरकांडात अग्निपरीक्षेनंतर सीतेचा त्याग झाल्यावर रामाने एकाकी राज्य केलं. त्या काळात राम मनाने एकाकी झाला. या काळात रामाचं मन वैराग्याकडे झुकलेलं होतं. हाच कालखंड रामाला आत्मशोधाच्या दिशेने घेऊन गेला असता का?

             रामाचा वनवास स्मृतिपरंपरेशी निगडित आहे. स्मृतीमध्ये कर्तव्य आणि धर्मपालनाला सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे रामाने कर्तव्य आणि त्यागाचं व्रत उचललं. पण राम एकटा असता, तर त्याने श्रुतीच्या वाटेवर चालत, आत्मशोधाचा मार्ग पत्करला असता.

             श्रुती आत्मशोधाची प्रेरणा देते, तर स्मृती कर्तव्याचा आदेश. रामाने स्मृतीचा मार्ग पत्करला, तर बुद्धाने श्रुतीचा.

              रामाचा वनवास धर्म आणि कर्मयोगाचं प्रतीक आहे, तर बुद्धाचा वनवास ज्ञान आणि ध्यानयोगाचं. रामाचा मार्ग सामाजिक उत्तरदायित्वाचं प्रतिक आहे, तर बुद्धाचा मार्ग मुक्ती आणि आत्मज्ञानाचं.

भगवद्गीतेत कृष्ण सांगतो:

"योग: कर्मसु कौशलम्" —कर्मामध्ये कौशल्य हेच योग आहे.

रामाचं जीवन हे कर्मयोगाचं मूर्तिमंत उदाहरण आहे, तर बुद्धाचं जीवन ज्ञानयोगाचा अविष्कार.

            रामाच्या वनवासात कर्तव्य आणि त्यागाचं द्वंद्व होतं, तर बुद्धाच्या प्रवासात वैराग्य आणि आत्मशोधाचं. रामाच्या जीवनात बाह्य संघर्ष होता—रावण, अधर्म आणि अन्यायाविरुद्ध, तर बुद्धाच्या जीवनात तो संघर्ष अज्ञान, मोह आणि दुःखाविरुद्ध होता.

           रामाचं समर्पण आणि बुद्धाची मुक्ति दोन वेगळ्या वाटा वाटत असल्या तरी, त्यांचं अंतिम ध्येय एकच होतं—स्वतःचं आणि जगाचं कल्याण. रामाने समाजासाठी कर्तव्य निभावलं, तर बुद्धाने समाजाला आत्मशोधाचा मार्ग दाखवला.

            रामायणाच्या उत्तरकांडात, सीतेच्या वियोगानंतर रामाने स्वतःला जनतेच्या सेवेसाठी समर्पित केलं. त्याचवेळी बुद्धाने निर्वाणप्राप्तीनंतर लोकांना 'धम्म' शिकवून त्यांना मुक्ततेचा मार्ग दाखवला.

           रामाचा आत्मशोध… शक्य होता का? यावर असे वाटते की राम एकटा असता, तर कदाचित त्याने कर्तव्याच्या बंधनांवर प्रश्नचिन्ह उभं करून आत्मशोधाची वाट धरली असती. त्याच्या मनात त्यागाच्या पलीकडे स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला असता.

              श्रीमद्भागवतामध्ये वर्णन आहे की रामाने वनवासात ऋषी-मुनींच्या सहवासात वेळ घालवला, तिथे अनेकदा वैराग्य आणि आत्मज्ञानाचे विषय त्याच्या मनात रुजले होते. हा विचार पुढे नेला असता, तर रामाचा प्रवास बुद्धाच्या वाटेवर गेला असता.

शेवटचा प्रश्न… "राम एकटा असता, तर तो बुद्ध झाला असता का?"

              हा प्रश्न केवळ पौराणिक नाही, तर मानवी जीवनाच्या गूढ प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारा आहे. कर्तव्य आणि आत्मशोध यामध्ये अडकलेली मानवी प्रवृत्ती आजही त्याच संघर्षात गुंतलेली आहे.

त्याग की आत्मशोध: निवड कुणाची?

रामाच्या मार्गाने चालावं की बुद्धाच्या?

समर्पणात समाधान आहे की आत्मशोधात मुक्ती?

हा प्रश्न प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात आजही गुंफलेला आहे. रामाने कर्तव्याची वाट निवडली, बुद्धाने आत्मशोधाची. तुमच्या मनातला राम कोणता मार्ग निवडेल?

***********

ता. क. -लिखाण माझे आहे... पण विचार मित्राचा होता.


-तेजश्री शिंदे ✍️ 



Comments

  1. वाह... दिवसाची सुरुवात अतिशय प्रगल्भ आणि वैचारिक लेखाने झाली. उत्तम लेख लिहिला आहेस तेजू. तुझ्या लिखाणाची शैली ही मुळातच इतकी खुशखुशीत आहे...की वाचताना कुठेही रसभंग होत नाही. अतिशय वेगळया विषयाला हात घातलास त्याबद्दल तुझे कौतुक. अशीच लिहित रहा. शुभेछा 💐💐💐

    ReplyDelete
  2. अप्रतिम लेख!👌👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खर आहे... चांगले मित्र असतील तर नक्कीच तुमचा विकास होतो...पण असे मित्र निवडणे आणि ते टिकवून ठेवणे तुझ्याकडून शिकावे. लेख अतिशय वैचारिक लिहिला आहेस. वाचक म्हणून विचारात थोडी भरच पडलीय.
      👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

      Delete
  3. Amazing write up ma'am....

    ReplyDelete
  4. खूप छान विचार मॅडम...दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली..मला म्हणावेसे वाटते

    प्रेम हे आगीत जळलेल्या मैत्रीसारखे असते. सुरुवातीला एक ज्वाला, खूप सुंदर, अनेकदा उष्ण आणि भयंकर, परंतु तरीही फक्त हलकी आणि चमकणारी. जसजसे प्रेम मोठे होत जाते, तसतसे आपले हृदय परिपक्व होते आणि आपले प्रेम निखाऱ्यासारखे, खोलवर जळणारे आणि अभेद्य होते.

    ReplyDelete
  5. उत्तम विषय आणि सुंदर मांडणी.

    मनाला एक प्रश्न नेहमी पडतो की एक पोलीस ऑफिसर इतक्या हळव्या आणि लेखिका तसेच कविमनाच्या कशा असू शकतात.


    All the best

    ReplyDelete
  6. तुझे लेख मी वेळात वेळ काढून वाचत असते.. तेजू...आज तू रामा सोबत बुद्धा चा फोटो टाकला मला प्रामाणिकपणे हा विचार आला की ह्यामध्ये काही चूक असेल बुद्धा विषयी तर मी ती करेक्ट करेल .पण तास कुठे आढळलेच नाही...काय ताकदीची लेखिका आहेस तू यार....being buddhist I haven't faith in Ram.. but first time in my life I felt something about Ram's existence only bcoz ur pure heart writting....First time someone is writing beyond biased..... तू अतिशय सुंदर आणि धाडसी लिहिलंय....खरच खूप कौतुक आहे तुझा....तुझा हा लेख वाचता क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की तू नोकरी सोडून पूर्ण वेळ लिखाण करावं...पण ते शक्य नाही...तुला उंच भरारी घ्यायला हि नोकरी वाट अडवत असेल..खूप मर्यादा ही तुझ्यावर येत असतील...पण माझी प्रामाणिक इच्छा की तू खूप खूप खूप लिहाव....दोन ओळी तुझ्यासाठी
    "घे उतुंग भरारी नभाशी
    तमा नको कुणाची
    विचार तुझे पंख होऊ दे
    आणि उंची तुझ्या कीर्तीची"

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.