पत्र लिहिण्यास कारण की..

 

(Adv. Vanraj Shinde)

पत्र लिहिण्यास कारण की..


              आज घराची साफ-सफाई करताना माझ्या जुन्या सूटकेस मध्ये एक फोल्डर सापडले... थोडी चाळाचाळ केली असता... माझे काही जुने लिखाण, कविता त्यात दडून बसलेल्या दिसल्या. त्या सगळ्या जुन्या आठवणींच्या कागदात  एक 'पत्र' अलगद वर आले..... प्रिय ताई...!


                सन 2012 मध्ये माझ्या लाडक्या भावाने.... वनराज याने मी पोलिस उपनिरीक्षक पदाची ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केली म्हणून मला एक पत्र लिहिले होते. जवळपास एक तप उलटून गेले. आज पुन्हा ते पत्र वाचताना भावंडं म्हणून आमचा प्रवास... विचार... दृष्टिकोन... सगळ्याच गोष्टी झरझर डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. तुमच्या सोबत पुन्हा एकदा तो पत्ररूपी शब्द प्रवास जगता यावा म्हणून त्याच्याच शब्दात जसेच्या तसे मांडत आहे.


प्रिय ताई,


                आज तुझ्या कष्टाचं चीज होताना पाहून फार बरं वाटतय तुझ्या संघर्षाच, तुझ्या साधनेच, तुझ्या तपश्चर्येच फळ तुझ्या पदरात एकदाचं पडलं हे फार बरं झालं. आईकडून, पप्पांकडून आणि मित्र रूपी जोडीदाराकडून या फळाला जरी मोलाच खत पाणी मिळालं असलं तरी त्या फळाचा खरा आस्वाद तू आणि फक्त तूच घेऊ शकतेस. आणि तायडा You Deserve It!!!


               कवी पाश म्हणतो, "आदमी का मर जाना खतरनाक नहीं होता सबसे खतरनाक होता है उसके सपनों का मर जाना". आणि तू तर स्वप्न पाहणं कधीच सोडलं नाहीस. आपल्या देशातील करोडो लोकं आपल्या स्वप्नांचा होणारा चुराडा रोज पाहत असतात आणि तरीही ते पुन्हा नवीन स्वप्ने घेऊन आयुष्याची नवी पहाट अनुभवत असतात. तुझ्या आयुष्यात देखील स्वप्नं भंग होण्याचे प्रसंग आले होतेच की, पण तायडे ज्या जिद्दीने तू नव्याने स्वप्न पाहण्याची हिम्मत दाखवलीस आणि त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी संघर्षरत राहिलीस त्याबद्दल तुझं कौतुक कराव तितके थोडच आहे. व्यक्तीगत पातळीवर स्वप्न पाहणं, ती पूर्ण करण्यासाठी झटणं आणि आपण पाहिलेली स्वप्नं जगणं हा प्रवास नितांत एकटेपणाच्या भूमिकेतून जातो हे मला ठाऊक आहे.


                    तुला आठवतं तायडे, आपल्याला दहावी की बारावीला एक कविता होती, ज्यामध्ये पावसाळ्यात गळू लागलेल्या झोपडीला सावरत-सावरत कवी उपाशीपोटी झोपतो आणि आईच्या कुशीत त्याला पोटभर जेवल्याच स्वप्न पडतं. अशा लाखो-करोडो लोकांना केवळ स्वप्नातच आपली पोटं भरण्याची वेळ येऊ नये म्हणून अनेक लोकांनी अशी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं की ज्यात उपाशी पोटी कोणी झोपणार नाही. काळाच्या पलीकडे दृष्टी असलेल्या अनेक द्रष्ट्या लोकांनी पाहिलेली ही स्वप्ने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत आहेत आणि त्याच बरोबर ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष देखील हस्तांतरीत होत आहे. स्त्री-दास्य, जाती-वर्ग व्यवस्थेचा अंत करून शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचं स्वप्न हे अशाच प्रकारच स्वप्न आहे. आज मी ह्या स्वप्नाचा आणि संघर्षाचा वाहक झालो आहे.


                  पोटभर जेवण मिळाल्याचे केवळ स्वप्न पाहणारी जनता आणि या जगाचे आणि त्यातील साधन संपत्तीचे अनभिषिक्त सम्राट बनण्याचे स्वप्न पाहणारे व्यक्ति, वर्ग, देश ह्यांचा आपआपल्या स्वप्नपूर्तीमध्ये एकमेकांशी संघर्ष होणं हे अटळच आहे. थोडक्यात आपण पाहत असलेली स्वप्ने ही वास्तविक समाज आणि संघर्षातूनच जन्माला येतात. तू पाहिलेलं स्वप्नं ह्या व्यवस्थेला तुझ्या नकळत अनेक धक्के देणारी गोष्ट ठरली आहे. या पुरुष प्रधान समाजात तू पारंपारिक विवाहित स्त्रीची चौकट मोडून एक मोठं आव्हान पेललं आहेस. आणि तुझ्या या संघर्षात तुला मित्र रूपाने मिळालेल्या जीवन साथीची साथ म्हणजे 'पुरुष' पणाच्या बेड्या मोडून माणूस म्हणून स्वतःच स्वत्व शोधण्याचाच केलेला एक संघर्षमय प्रवास आहे.


                 दिदीने तिच्यासाठी पाहिलेली स्वप्ने नेमकी कोणती होती किंवा आहेत हे मला माहीत नाही पण मला तिचा सगळा प्रवासच स्वप्नवत वाटतो! ती जगत असलेल्या आयुष्याची तिने स्वप्नात देखिल कल्पना केली नसेल. तिचा सगळा प्रवासच गमतीशीर आहे. मी माझ्याबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा मला मी उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहणारा प्राणी आहे असं वाटतं. त्यामुळे माझे बंद डोळे ज्या-ज्या वेळी उघडतात त्या-त्या वेळी माझ्या स्वप्नांची बेरीज किंवा वजाबाकी झालेली असते.


                काही म्हण तायडे, पण तू, दीदी आणि मी असं तिघांच्या प्रवासाकडे जेव्हा मी बघतो तेव्हा अत्यंत समाधान वाटतं! आणि हेच समाधान मी आई-पप्पांच्या डोळ्यांत बघतो. आनंदाची आणि सुख समाधानाची यापेक्षा वेगळी कल्पना त्यांच्यासाठी काय असेल?

      

                  तुझे स्वप्नं तू साकारलेस त्याबद्दल तुझे अभिनंदन! यापुढील आयुष्यात अधिक मोठी स्वप्ने तू साकारावीत आणि आपली स्वप्ने साकारत असताना मानवमुक्तिच्या स्वप्नास आणि ते पूर्ण करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नास तुझा हातभार लागावा ही सदिच्छा व्यक्त करून थांबतो.


                                                                वनराज.


















Comments

  1. अशी ताई प्रत्येकाला मिळावी...!!

    ReplyDelete
  2. Khup chan lihoe ahe tumchya bandhurayani....asech bonding sadaiva raho .

    ReplyDelete
  3. खूप छान पत्र तेजू!.. मी वनराज प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी त्याच्या पत्रातून तो पूर्णपणे नजरे समोर आला.. तुम्हां भावंडांमधले आपापसातले प्रेम, आपुलकी, तुमच्या आईवडिलांनी तुम्हां भावंडांवर घडवलेले संस्कार, तुमची वैचारिक पातळी ह्या सार्‍या गोष्टींचे दर्शन ह्या पत्राद्वारे घडते.. तुझ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे दर्शनही घडते.. ध्येयसिद्धीसाठीची तुझी धडपड, कधी हार न मानणे अन्‌ ध्येय साध्य होईपर्यंत शांत न बसणे हे असामान्यच!
    हेच पत्र इथून पंधरा वर्षांनंतर तू परत एकदा वाचशील तेंव्हा ह्याचा गोडवा अन्‌ महती द्विगुणित झालेली असेल कारण तेंव्हा तू तुझ्या करियर मधली नवनवीन शिखरे पादाक्रांत केलेली असतील.. कारण भावना जेव्हढ्या जुन्या तेव्हढ्याच परिपक्व!
    थोडक्यात काय तर तुम्हां भावंडांमधली वैचारिक परिपक्वता ही तुमच्या पालकांकडून वारसा हक्काने मिळाली असणार ह्यावर माझ्या मनी तिळमात्रही शंका नाही.. पत्र लिहिणारा दादाही आवडला अन्‌ पत्रातून उलघडलेली तायडीही आवडली.. हे पत्र शेअर केल्याबद्दल धन्यवाद.. 😊😊😊

    ReplyDelete
    Replies
    1. तू नेहेमीच माझ्या लिखाणाला उस्फूर्त दाद देत असतोस... आज वनराज च्या या प्रगल्भ विचारांवर तुझ्या या मौलिक अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 😌🙏

      Delete
  4. Chan shabd... Sunder bhavna... Very touching... Vakilanchya kalya kot magche subhra pandhare hriday ani man.... Raktachi nati....

    ReplyDelete
  5. काळाच्या पलीकडे दृष्टी असलेल्या अनेक द्रष्ट्या लोकांनी पाहिलेली ही स्वप्ने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत आहेत आणि त्याच बरोबर ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष देखील हस्तांतरीत होत आहे. स्त्री-दास्य, जाती-वर्ग व्यवस्थेचा अंत करून शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचं स्वप्न हे अशाच प्रकारच स्वप्न आहे. आज मी ह्या स्वप्नाचा आणि संघर्षाचा वाहक झालो आहे.

    किमान 12 वर्षापूर्वी जर विचारांचा हा पल्ला असेल तर तुमचे बंधू आज वादळ असतील..यात यत्किंचितही शंका नाही. शब्दांची धार अतिशय तीव्र आणि तितकीच संयमी आहे... तुम्हा भावंडांची ही देवाण घेवाण पाहिली की वाटते तुमच्या पालकांनी तुमच्यावर त्या पिढीतील सर्वोच्च संस्कार केले आहेत. असे लिखाण आणि इतके विवेकशील पत्र वाचनात येणे दुर्मीळच.. हे पत्र आमच्यासोबत वाटून घेतल्याबद्दल मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद 😊

      Delete
  6. Lovely 🌹. True emotions poured by a brother in success of a sister's achievement........ truly emotional . Heart touching ❤️❤️

    ReplyDelete
  7. Api घनश्याम बोरसे11 December 2024 at 09:23

    तेजश्री मॅम नमस्कार
    आपल्या भावाने आपल्याला लिहलेले पत्र वाचले वाचतांना मनात विचार आला कि आम्हीपण अशीच मेहनत घेतली स्वप्न पहिले परंतु इतके सुंदर पत्र लिहिण्या इतपत कोणी लेखक मनाचा / कवी मनाचा आम्हाला आमच्या कुटुंबात कुणी नव्हता 😂

    ReplyDelete
  8. With too many emotions my eyes are wide and filled with tears! May Allah swt bless ur bond and strength in togetherness!!

    ReplyDelete
  9. Khupach antarmanatlil भावना मांडल्या.. खूप जीव असलेली भावंडे .. असेच पृथ्वी तळावर सर्वात भाऊ बहीण असतात, कोणी लग्न झाल्यावर बदलतात, तर कोणी यशस्वी झाल्यावर. thanks वनराज तू तेजू cha भाऊ असल्याचं अभिमान वाटतो मला. एका बहिणीची प्रेरणा तू शब्दात मांडली...thanks brother...

    ReplyDelete
  10. तुम्ही तिन्ही भावंडं एकमेकांना घट्ट धरून आहात.
    तुम्हा तिघांचे एकमेकांवर मनस्वी प्रेम आहे.
    तुम्हा तिघांकडे पाहिलं की अशी भावंडं असली पाहिजेत असे मनोमन वाटते.
    आजच्या स्पर्धात्मक जगात जिथे रक्ताची नाती एकमेकांची हाडवैरी होतात अशा जगात तुम्ही तिन्ही भावंडं एकमेकांचा आदर करता , मान राखता , एकमेकांच्या यशाचे मनोभावे कौतुक करता ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
    तुम्हा तिघांचं एकमेकांना सांभाळणं , काळजी करणं, कौतुक करणं हे हेवा वाटावा इतके हृदयस्पर्शी आणि अप्रतिम नाते आहे.
    लहान भावाने मोठ होऊन बहिणींच्या कठीण काळात धीरोदात्तपणे त्यांच्या सोबत उभे राहणे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे.
    आई वडिलांचा आदर कसा करावा आणि त्यांना कसे जपावे याचे जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही तिन्ही भावंडं आहात.

    " चाहे पुरी दुनिया क्यू ना एक तरफ हो जाये लेकीन मैं मेरी बेहेनो के साथ आखरी सांस तक बिना डगमगता खडा रहुंगा " हे जे तुमच्या भावाचे वागणे आहे ते तुम्हा दोन्ही बहिणींचे मनोबल कितीतरी पटीने वाढवते आणि तसेच तुम्ही दोघी देखील लहान भावाच्या प्रत्येक गोष्टीचे , यशाचे भरभरून कौतुक करता , ते यश मोठ्या दिमाखात साजरे करता आणि त्याला तुम्ही पावलोपावली त्याच्यासोबत भक्कमपणे उभ्या आहात याची शाश्वती देता. किती सुंदर नाते आहे तुम्हा तिघांचे दृष्ठ लागावी असे तरल हृदयस्पर्शी भावस्पर्शी , निखळ आनंदाचे , अतूट विश्वासाचे तुमचे हे नाते चिरायू होवो , चिरंजीवी होवो.
    एका शब्दात तुम्ही तिघे एकमेकांसाठी कोण आहात तर तो शब्द आहे *मितवा - मित्र तत्वज्ञ वाटाड्या*
    तेजश्री , शुभांगी , वनराज तुम्ही तिघे आणि तुमचे हे लाजवाब नाते कधीही संपू नये हीच सदिच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद सौरभ दादा... तुझ्या या शब्दांमुळे कुटुंब म्हणून मोलाची थाप मिळाली आहे. हे विश्वची माझे घर... हे संस्कार रुजवणारे कुटुंब मित्र परिवार आम्हाला लाभले हे आम्हा भावंडांचे भाग्यच! 😌😌😍😍🙏🙏🙏

      Delete
  11. खूप छान लिहिलं आहे... ❤️अप्रतिम...

    ReplyDelete
  12. अप्रतिम

    ReplyDelete
  13. Khupach सुंदर. असे बहीण भाऊ सर्वांना लाभावे. जे भावा बहिणीचा संघर्ष, यश जवळून पाहून व्यक्त होतात. बहीण भाऊ चे नाते अनमोल आहे. पण काही बहीण भाऊ यशस्वी झाल्यावर किंवा लग्न झाल्यावर बदलतात व पक्के वैरी होताना मी जवळून पहिले. अभिमान आहे तुझा... तुला असा भाऊ बहीन लाभले.. तू आहेसच कौतुक करुण मनात निरंतर राहणारी. आणि जोडीदारही नशिबवान असावा ज्यांनी तुला निवडलं...
    सल्लुट आहे त्या आई वडिलांना, भावंडाना व तूझ्या जोडीदाराला.. जे तुला नेहमी supportive आहेत...keep it up dear...

    मला अभिमान वाटतो की तू माझी मैत्रिण मार्गदर्शक आहेस.

    खूप छान feeling proud 💐💐

    ReplyDelete
  14. अतिशय सुस्पष्ट , मुक्तपणे विशेष करून नैसर्गिक भाषेत मजकूर शब्दबद्ध केलेला आहे आणि खुप सुंदर शब्दांकन आहे...
    मी साहित्यिक नाही परंतू एखाद्या साहित्यकाला लाजवेल असंच लिखाण आहे....
    खुप आवडले
    Great 👍👍
    Sampatrao Patil
    ACP Mumbai

    ReplyDelete
    Replies
    1. आदरणीय सर..
      आपल्या उस्फूर्त अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद 😊🙏

      Delete
  15. अप्रतिम प्रेम सौंदर्य आणि शब्द सौंदर्य याचा मूर्तीमंत दाखला म्हणजे आपण.........

    ReplyDelete
  16. अप्रतिम...so proud of you 💐

    ReplyDelete
  17. अप्रतिम

    ReplyDelete
  18. खूप छान..👌👌👍👍

    ReplyDelete
  19. खूप छान

    ReplyDelete
  20. भावा बहिणीं मधील नातं असंच अतुट असतं. वनराज अप्रतिमपणे व्यक्त झाला आहे.

    ReplyDelete
  21. Bhau bahinich hey premal nath asch kayam rahave

    ReplyDelete
  22. आता कोणत्या पदावर व कुठे पोस्टींग आहे.

    ReplyDelete
  23. वनराज एवढं छान लिहू शकतो हे आज कळलं. मला असं वाटलं जणू माझ्याच भावना त्यांनी कागदावर उत्रवल्या आहेत. फक्त स्वप्न बघू नये तर ते पूर्ण करण्यासाठी फक्त मेहनत नव्हे तर परिवाराचा साथ आणि आई बाबांनी दिलेले संस्कार सुद्धा लागतात आणि या गोष्टीचा तुझ्या पेक्षा सुंदर उदाहरण कोण देणार? मला गर्व आहे की तू माझी मैत्रीण आहेस आणि तुला माहीत असो किंव्हा नसो आज मी तुला सांगू इच्छिते की तू माझ्या साठी पण प्रेरणा स्तोत्र आहेस. तुझे पुडचे ही स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुला खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. तुझ्या या भावुक शब्दांसाठी मनापासून धन्यवाद वर्षा..... खरच कुटुंब हा जगण्याचा आधार असतो.😊😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.