सखी'चे पत्र (8).... ओला वाळवंट!


 पत्र (8)


प्रिय अमर,


             अरे.. मी काही लिहिले नाही याचा अर्थ असा मुळीच नाही की तू व्यक्त होणे सोडून द्यावे. माझा राग हा काही फार काळ टिकणारा नसतो हे माहीत असूनही इतक्या महिन्यांचे मौन धारण करणे तुला शोभत नाही. मी काही तुला जज करत नाही आहे बर का!... पण तुझे हे असे तुटक वागणे अगदी पहिल्यांदाच जिव्हारी लागले. आपल्या आवडत्या व्यक्ति सोबत असे कोण वागते. मुळात तुझ्या वागण्याचे अनेक धागे-दोरे मला कधी जुळवताच आले नाहीत बघ. माझ्या सारख्या मनमोकळ्या स्वभावाची व्यक्ती बोलून मोकळी होते... तुझ्यासारखे नाही हो! उगाच आपल्या आविर्भावात जगत रहायचे. 

               

          असो... तू कॅनडाला तीन वर्षांच्या प्रमोशनवर जाणार म्हणून मी फार आनंदी होते. त्या निमित्ताने एक नवा देश तुझ्या जाणिवेतून उमगून घ्यायला मिळणार याचा कोण आनंद झाला म्हणून सांगू...!! पण कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक??? तू गेलास ते पुन्हा वळून न पहाताच.

          असे अधूनमधून मागे वळून पाहिले पाहिजे नाही का??... आपण पुढे निघून जाताना कोणी आपल्यासाठी तिथेच तर थांबले नाही ना याची एकदा तरी खात्री केली पाहिजे. तू तसाही थांबणार्‍यातला नाहीस हे कळून चुकले होतेच की!...पण तरीही तुझ्या सोबत समांतर प्रवास करण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझाच आहे यात काही शंका नाही....आणि माझा आनंद मुळात त्यातच आहे. आपण निर्माण केलेल्या भावविश्वात मी फार रमते असे तू गमतीने म्हणायचास... पण खर सांगू... मला आवडंत आपल्यात रमायला. उगाच इतरांच्या भावविश्वात लुडबुड करून तिथे काहूर माजवण्यापेक्षा आपले हे बरे. 

          हल्ली माणसे वाचायची सवय चांगलीच जडली आहे. बॅक ऑफिसला काम करून करून रुटीन थोडे रुक्ष झाले होते. आता मात्र रोज नव्या नव्या क्लाइंटला भेटणे.. त्यांच्या ऑफिसला व्हिजिट करणे.. हा कामाचा भाग झाला आहे. अनेक ऑफिसेसमध्ये तासनतास उगाच बसून रहावे लागते अशावेळी तेथील येणार्‍या जाणार्‍या माणसांची निरीक्षणं करण्याचा नवा छंद जोपासला आहे.

गुल्लक सी है जिंदगी
बड़े धीरे धीरे भरती है..
हर एक सिक्के के साथ 
अपना मोल बढ़ाती है..

           अमर... तू पुरुष म्हणून विचार न करता थोडे तटस्थ राहून मी काय बोलतेय याकडे बघ. माझ्याच ऑफिस मधील रोमा अतिशय सुंदर स्त्री...तिच्याच बाजूच्या डेस्क वरील पुरुषाच्या प्रेमात पडलीये. दोघेही विवाहित.. तरीही पुन्हा प्रेमात. साधारण काही महिन्यांच्या त्यांच्या नात्यात आता मात्र पूर्वीसारखी ओढ दिसत नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक पडला आहे... बोलणे तुटक वागणे तुटक..! हे असे का झाले याचा थोडा विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली... आपल्याला सामाजिक चौकटींच्या बाहेर पडून मनासारखे वागायचे झाले तर ..आपण त्यासाठी पुन्हा एखादी भंपक चौकट स्वीकारतो. लग्न संस्थेत अतृप्त असलेले आत्मे प्रेम या चौकटीत आपल्या अतृप्त इच्छा पूर्ण करत असतात...आणि जेव्हा त्या पूर्ण होतात त्यानंतर त्या व्यक्तीची त्यांच्या आयुष्यात फार काही जागा उरत नाही... नुसता व्यवहार!

         मला तू सर्वांगाने आवडतेस आणि मला तुझ्या सोबत काही रात्री घालवायला आवडतील... असे सरळ सरळ विचारण्याची धमक आपल्या समाजव्यवस्थेतील पुरुषात असणे विरळाच.. मग मला तू आवडतेस पासून... सुरू होऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे हे बोलून काही काळासाठी एकत्र येणारे पुन्हा का दुरावतात याचे उत्तर त्यांच्या जगण्यातच दडले आहे..रुक्ष... बोथट...तर्कशून्य विचार!?


          सामाजिक मूल्य दिवसेंदिवस बदलत चालली आहेत. आपल्यापेक्षा हल्लीची पिढी ही जास्त फ्लेक्सिबल आहे.. सर्वार्थाने! तरीही बाई मनावर बोलणार्‍यांनी पुरुषाच्या मनातील गुजगोष्टी देखील सांगितल्या पाहिजेत. पुरुष म्हणून त्याची झालेली जडणघडण, विचारांची गुंतागुंत, तटस्थता,भावनिक कोलाहल, वगैरे वगैरे...

              काही गोष्टी आपण टैबु बनवून ठेवल्या आहेत... तरीही त्या घडतातच की... मग या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे असे नाही का वाटत तुला??? माणूस म्हणून जगणे खरच महाग होऊन बसले आहे. पुस्तकांपेक्षा वाचलेली माणसे अधिक अस्वस्थ करतात.

         असो....साधारण वर्ष होत आलं तुला कॅनडाला जाऊन. मी फार पूर्वी एक नॉवेल वाचले होते Anne of Green Gables" by Lucy Maud Montgomery अतिशय सुंदर पुस्तक आहे...त्यात Anne च्या आयुष्यातील प्रवासासोबत कॅनडाच्या निसर्ग सौंदर्याचे आलेले वर्णन हे आयुष्यात एकदा तरी कॅनडाला भेट देण्याची इच्छा जागृत करते. तिथली माणसे.. त्यांचे राहणीमान.. संस्कृति.. विचारधारा...निसर्ग...फुले...फळे... खानपान...तो बर्फाचा ओला वाळवंट अगदी सगळे सगळे अनुभवायची इच्छा होते..!! 

           माझे पत्र मिळताच तू कुठे कुठे फिरलास.. काय काय अनुभवलेस.. जे जे तुला जाणवले.. ते सगळे लिहून पाठव हं! व्हिक्टोरिया पार्क येथे गेला होतास का.. तेथील निसर्ग सौंदर्य भुरळ घालणारे आहे असे वाचले होते.. तसेच त्यांच्याकडील स्त्री सौंदर्या बद्दलही बरेच वाचले आहे बर का... तुझ्या लिखाणातून ते अनुभवता येईलच... हाहा..!

           ओल्या वाळवंटासारखा आपल्या मैत्रीतील ओलावा ही असाच बहरत राहो...निखळ सौंदर्याची भेट तुझ्या जाणिवेतून करून घेण्यासाठी आतूर असलेली...


                                    तुझ्यातच दडून तुला शोधणारी                                                                       सखी 






Comments

  1. सखी,
    एकतर खरंच खूप दिवसांनी पत्र वाचायला भेटले तुझे, तसही अमर पेक्षा तुझ्या पत्राची ओढ मलाच अधिक असते. कारण तुझ्या पत्रात प्रेम, मैत्री आणि मानवी आयुष्य या पैलूंचा समावेश असतो. तसेच एखादा सामाजिक विषय अगदी प्रेमाने आणि परिणामकारक शब्दात मांडली आहेस. रोमा ची कथा ही बऱ्याच लोकांची कहाणी आहे. परवाच मला माझी एक मैत्रीण याच विषयावर बोलली, म्हणाली की जर दोघे mature असले की स्पष्ट बोलुन आवश्यक गरजा पूर्ण करण्याची मागणी करायची सरळ सरळ. त्यात भावनिक गुंता कशाला करायचा हे अगदी छान काल्पनिक कथेतून वास्तव मांडले आहेत.
    आजच्या पत्रात सुद्धा बरेच विषयांना तू स्पर्श केला आहेस. अमर ची कॅनडा ट्रीप, रोमा ची कथा, अमर ची कौतुक करण्याची सवय, समांतर चालण्याचा सखी च निर्णय, आणि गूल्लक सी है जिंदगी, धीरे धीरे भरती है, हर एक सिक्के के साथ, अपना मोल बढती है, खूप छान तेजू. खरंच तुझ्या शब्दांची निवड, त्यांची सांगड, ती रम्य सुरवात, तो शांत मध्य आणि आणि तो भावनिक शेवट वाह, लाजवाब...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अझहर..! मुळात ही पत्रांची लेखमाला माझ्या विशेष आवडीची आहे. लेखक म्हणून एखादे पात्र उभे करणे यात कस लागतो... सखी आणि अमर हे आजही लोकांना तितकेच आवडत आहेत हे पाहून समाधान वाटले... मुळात माझ्या विचार आणि अनुभवांना वाट करून देण्यासाठी मी लिखाण सुरू केले होते... जे दिवसेंदिवस अतिशय प्रगल्भ अनुभव देत आहे...वाचक म्हणून तुमच्या सारख्यांच्या प्रतिक्रिया अनमोल आहेत.

      Delete
    2. Beautiful 👌👌👌

      Delete
    3. खूप छान लिहितेस. ओघावती भाषा आहे. विचारांची खोली जाणवते लिखाणात. तरल, सूक्ष्म जाणीवा दिसून येतात.
      👌🏻👌🏻👌🏻 👍🏻👍🏻👍🏻

      Delete
  2. नात्यांमधली प्रगल्भता नेहमीच मर्यादित असते मग तिचा परीघ कितीका मोठा असेना. म्हणजे पृथ्वी सूर्या जवळ आहे आणि प्लुटो खूप दूर तरीही सूर्याचे गुरुत्वाकर्षण काम करतेच फक्त प्रभाव निराळा तसेच काहीसे. याउलट तू व्यक्तींमधली प्रगल्भता शोधायचा प्रयत्न करते आहेस पण व्यक्ती अशी अस्तित्वात नसतेच कधी किंबहुना ती आपल्यापर्यंत नात्यांच्या रूपातच पोचते....आत्ता कसं करावं हाच सनातन प्रश्न आहे!

    बाकी दोन स्वायत्त व्यक्तींमधली प्रेमाचे स्वरूप कसे असावे मानसिक की शारीरिक ही तसा सापेक्ष प्रश्नच म्हणायला हवा. दोन स्थिर व्यक्तींमध्येही हा प्रश्न अनेक वेळा सतत बदलत असतो.

    इमॅन्युएल कान्ट म्हणतो त्याप्रमाणे हे न सुटणारे द्वैत आहे!

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा! अतिशय प्रामाणिक अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद. तुझा अभिप्राय वाचून University मधील दिवस आठवले..😊 इमॅन्युएल कान्ट तेव्हा वाचला होता... कान्ट आणि त्याचे सौंदर्यशास्त्र ! पुन्हा वाचनाची संधी मिळाली नाही.. पण या निमित्ताने नक्कीच वाचून घेईन.

      Delete
    2. सुंदर कविता.

      Delete
  3. Very nice 👌👍

    ReplyDelete
  4. Manus mhnun aapn kharch mahag houn baslele aahot...pustkapeksha wachleli manse adhik aswath krtat...what line mam..

    ReplyDelete
  5. ज्याला खरच कळतंय भावभावनांचे गांबिर्या, तोच उतरू शकतो कागदा वार सौंदर्य...

    ReplyDelete
  6. जेंव्हा लढाई विचारांची असते, तेंव्हा *सत्यज्ञान* हे ब्रम्हास्त्रा प्रमाणे असते...

    ReplyDelete
  7. ओला वाळवंट..... वाह
    वाळवंट पहिला होता पण तोही ओला.....फारच छान..... भावल
    बऱ्याच दिवसांनी सखी भेटली ♥️
    आजच हे पत्र काहीस वेगळं जाणवलं .... त्याच कारण असं की, या पत्रा मार्फत आपल्या आजूबाजूला जी काही हालचाल होते आहे ती स्पष्ट डोळ्या समोर आली.

    कित्येक पिढ्यान पासून आपण जी समाज व्यवस्था चालवतो आहे...त्याला आता पंख लावण्याची वेळ आहे असं वाटत...कारण पुरुष असो वा स्त्री doesn't matter, here only matters "The pure feelings" ज्या तुम्ही किती निखळतेने समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवता, मनात येणारी भावना सहज बोलून मोकळं व्हाव....त्या फुलपाखरासारखं जे सुदंर फुलांवर बसत आणि उडून जातं... त्याला पाहताना केवळ आणि केवळ आनंद च होतो, जसं सहजतेने सखी ने अमर ला जाऊ दिलं.
    आजच हे पत्र आपल्या प्रत्येकाला विचार करण्यास भाग पडणार आहे... खरंतर हे सर्व प्रश्न मला अनेकदा पडले..... प्रेम एका व्यक्ती वरून दुसऱ्या व्यक्ती वर शिफ्ट कसं होऊ शकत....?? याच उत्तर या पत्रातून मला मिळालं
    Thank you सखी💝
    हा ओला वाळवंट आणखी बहरत राहो 💌


    ReplyDelete
    Replies
    1. ओला वाळवंट ही संकल्पनाच बहारदार आहे... त्यात ती सखी आणि अमर यांच्या नात्यात चपखल बसते...मुळात भारतीय समाजव्यवस्था हा सखोल विषय आहे...पण बदलणारी सामाजिक मूल्ये आपण खुल्या विचारांनी स्विकारायला हवीत.. कोणतेही पाल्हाळ न लावता..अमर आणि सखी हे अशाच सामाजिक मूल्यांची चर्चा करत आहेत जे त्यांच्या जगण्याचा देखील भाग आहे... ही लेखनमाला त्यामुळेच वाचकांच्या आवडीची ठरत आहे. तुझ्या संवेदनशील आणि प्रगल्भ अभिप्रायासाठी मनापासून धन्यवाद हर्षला...!

      Delete
  8. खरंच खूप छान लिहिले आहे. एक भावनिक विश्व खूप सुंदररित्या सादरीकरण केले आहे. एक ओढ, एक आशा, एक अपेक्षा आणि एक वैचारिक प्रगल्भता , यांची सांगड खूप उत्कृष्टपणे मांडली आहे. कवी किंवा लेखक यांचे खूप आश्चर्य वाटते, कारण विचारांच्या सागरामध्ये डुंबून कथा, कविता, चारोळी, यांसारखे मोती सादर करतात. त्रिवार अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. अनेक धन्यवाद सर..अमर आणि सखी यांचे भावविश्व वाचकांना आवडत आहे ही खरच माझ्यासाठी आल्हाददायक बाब आहे.

      Delete
  9. Apratim , kharach chan

    ReplyDelete
  10. Truth of today's world is been depicted in this lovely letter. Speechless!!!!!. What a thoughtful letter. 💕💕💕💕. Reading this letter took me to a journey ❤️❤️❤️. Loved it 👍👍👍👍

    ReplyDelete
  11. अप्रतिम लिखाण मॅडम, पोलीस खात्यातील नोकरीतून वेळ काढत छान छंद जोपासलाय आपण ❤️👌

    ReplyDelete
    Replies
    1. लिखाण करण्याचा प्रयत्न करत आहे.

      Delete
  12. अप्रतिम मॅडम

    ReplyDelete
  13. अतिशय सुंदर लिखाण तेजू! अंतर्मुख करणारं! स्वतःमध्ये अमर अन्‌ सखीस शोधणारं!

    समांतर प्रवास!.. किती प्रगल्भता! मनात थोडं शल्य असूनही उत्कट प्रेमाची प्रचिती! सोपं नसतं हे! प्रेम म्हणजे त्याग ह्या विचारांचा मी नाही.. कारण त्या so called त्यागातून मिळणार्‍या निःस्वार्थी समाधानाचा आपण कधी त्याग करू शकतो का? समांतर प्रवासात आपल्या आवडत्या व्यक्तीचे यशापयश दूरवरून पाहण्याचे समाधान हे नक्कीच मनातल्या शल्यापेक्षा वरचढ ठरते निस्वार्थी प्रेमात.. हीच ती प्रगल्भता सखी मध्ये दिसते!

    प्राप्ती अन्‌ तृप्ती ह्या खरंतर सख्ख्या बहिणी! पण त्याही कधीकधी एकमेकावर रुसतात व अबोला धरतात.. ह्यामुळे होणार्‍या मनातील द्वंद्वाचा अंश सखीच्या पत्रात दिसतो लग्नसंस्था अन्‌ समाजसंस्था यावरील लिखाणातून..

    माणसं वाचण्याची सवय.. ओला वाळवंट.. हे ह्या पत्रातील अजून काहीसे विशेष पैलू.. शब्दांची निवड अन्‌ विचारांची भावनिक सांगड ह्यांचा अपूर्व संगम म्हणजे हे सखीचे पत्र!

    Kudos Teju!! 👌🤝

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मंगेश! सखी आणि अमर यांचे विचार, जीवनानुभव, त्यांचे निर्णय आणि एकंदरीत त्यांचा समांतर प्रवास आपल्याला भावला हे वाचून बरे वाटले. लेखक आपल्या विचारांतून पात्र घडवत असतो...परंतु ती वाचकांना आवडतील का याबाबत त्याला काहीएक माहीत नसते...लिहून मोकळे होण्याचा हा प्रवास तुमच्या सारख्या वाचकांमुळे अधिक समृद्ध होत आहे... आपले अभिप्राय असेच कळवत रहा.

      Delete
  14. Very nice 👌👌

    ReplyDelete
  15. कधी कधी नक्कीच अमर सारखे बऱ्याच पती किंवा पत्नीला प्रमोशन मुळे शहर ,राज्य ,देश बदलावे लागत असतील
    पण तिथे कोणासाठी गेलो आहोत आपण आणि तिनेही मला परवानगी दिली आहे का दिली तिने?
    का ती मी दूर जाण्याच्या विरहाला सहन करायला तयार झाली??
    कारण तिचा अमर वर असलेला नितांत आणि प्रचंड विश्वास
    की नाही माझा अमर कधीच बदलणार नाही
    🙏🏻 एकमेकांचा विश्वास कधीच तोडू नका आणि सुंदर जीवनाची राखरांगोळी करू नका

    ReplyDelete
  16. Well written! Mastch

    ReplyDelete
  17. अमर व्यक्त होत नाही म्हणुन सखीची व्याकुळता, अपेक्षा, व्यथा फार चांगल्या शब्द मोती मध्ये मांडली आहे.

    सातत्य ठेवावे, आम्हा वाचकांना लेख स्वरूपी मेजवानी मिळावी..

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  18. वाह! पत्रातून हा संवाद रंगत चाललाय तेजू. ही पात्रं पकड घेताहेत. तू लिहीत राहा. पु. शि. रेग्यांची सावित्री कादंबरी आठवतेय.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद गीतेश! सहज एका प्रवाहात केलेले हे लिखाण आहे.. त्या ओघात ही पात्र खुलत चालली आहेत. सखी आणखीन प्रगल्भ होत तिच्या विचारांतून पुढे येत जात आहे. हळूहळू अमर देखील असाच खुलेल. त्याचे व्यक्तिमत्त्व सखी पेक्षा निराळे आहे... आणि त्या दोघांच्या या वेगळेपणातून ही पत्रे अधिक व्यापक होत जाऊन अनेक पातळीवर जावून खुलतील हे नक्की.

      Delete
    2. उत्सुकता आहे

      Delete
    3. प्रयत्न करतेय

      Delete
  19. Really this is how the world is today and people are like this. You have written a very nice article.

    ReplyDelete
  20. खूप दिवसांनी आज तुझे लेखन वाचले...खूप छान वाचले...हा प्रवास करताना, वाचताना उत्सुकता वाढत आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद 😊

      Delete
  21. सफर कितीही असो, मुश्किल,
    नियती कितीही असो, संगदिल,
    कारवा कितीही असो बुझदिल
    आम्ही पुढे जात राहू,
    अप्रतिम
    आहे सखी चे पत्र

    ReplyDelete
  22. प्रियंका बाबर25 August 2023 at 09:59

    खुप छान, keep it up 👌👌👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. Dnyaneshwar Jadhav25 August 2023 at 17:08

      अतिशय सुंदर आणि मार्मीकपणा आहे,खुप छान ...👌
      पत्राचे सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत मनातील उत्कटता आणि त्यातून मनाची होणारी घालमेळ अतिशय सुंदर आणि बिनधास्त शब्दांमधुन व्यक्त होत आहे. परिस्थीतीची जाणीव करुन देणार आणि सत्य स्विकारण्यास भाग पाडणार वास्तव वादळ मनामध्ये काहुर करु पाहतांना दिसतेय मात्र तक्रार न करता मनाला समजून आणी सख्याला साद घालण्याचा अप्रतिम प्रसंगाचे वास्तव सत्य या निमित्ताने अनुभवण्‍यास मिळाला पुढील पत्रासाठी शुभेच्‍छा...आणि वाट पाहत आहोत.
      श्री ज्ञानेश्वर जाधव

      Delete
    2. Very Nice.....👍👍👍

      Delete
  23. अमर व्यक्त होत नाही हे लक्षात आल्यानंतर जी मनाची घालमेल आहे ती नेटक्या शब्दात छान लिहिली आहे.
    अमर कॅनडा ला जाणार त्यामुळे अप्रत्यक्ष आपल्यालाही कॅनडा पाहायला मिळणार ही उत्कटता सुंदर लिहिली आहेस.
    मागे वळून पाहिले पाहिजे इथपासून सोबत प्रवास करण्याचा निर्णय आणि त्यातील आनंद. आपण निर्माण केलेले भावविश्व त्यात रमायला आवडणे हे अनेकांच्या किंवा प्रत्येक व्यक्तीसोबत घडणारे आहे त्यामुळे त्याच्याशी वाचणारा एकरूप होतो आणि काही क्षण स्वतःच्या भावविश्वात फेरफटका मारतो जसे की माझे झाले.
    माणस वाचणं आणि माणसांचं निरीक्षण करण्याचा छंद जोपासणे हे तसे म्हणाल तर अवघड काम आहे पण तासनतास बसून राहावे लागण्याच्या कंटाळवाण्या प्रोसेस मधून असा छंद शोधून काढणे आणि तो सकारात्मक जोपासणे यासाठी कौतुक करावे तितके थोडे आहे.
    गुल्लक सी है जिंदगी - यामधून एक एक नाण्याबरोबर आपलं मोल वाढत जात. एका झटक्यात आणि एका फटक्यात काहीच होत नसत / होत नाही संयम ठेवून हळूहळू एक एक पाऊल पुढे जायचं असतं ही अत्यंत महत्वाची अर्थपूर्ण शिकवण यातून मिळते.
    लुसी मोंटगोमेरीच्या पुस्तकात आलेले कॅनडाचे वर्णन छान आहे. ओल्या वाळवंट ची कल्पना मैत्रीतील ओलावा ही वाक्यरचना अफलातून आहे.
    सौरभ

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सौरभ दा. अनेक अंगांनी पत्र स्वरूपातील हा संवाद खुलवण्याचा प्रयत्न केला आहे.. तुला तो भावला हे महत्वाचे... आणि हा ओला वाळवंट अनेक अर्थांनी वाचकांसमोर उभा आहे. वाचक त्याचा रसास्वाद घेत आहेत यात वेगळाच आनंद आहे.

      Delete
  24. व्वाहा..!!! खूपच अप्रतिम लेखणी मॅडम... रोजच कर्तव्य, कुटुंब अन् जबाबदाऱ्या योग्य प्रकारे सांभाळून यवढ सुंदर विचार मांडणे हा म्हणजे तुमच्या विचारातील फक्त आणि फक्त POSATIVENESS पणाच असू शकतो

    ReplyDelete
  25. Patra 8 vachle.... patratil kekh janu kahi mazyach sathi lihila ase mala vaatle ....Prema peqshahi vishwas mahatwacha asto ..ek na ek shabda kaljat rula ahe... All the Best.... Very Beautiful Writing....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.