सखी'चे पत्र (5)... उत्कटता

 



                   पत्र (5)


प्रिय अमर,

                     

                    कसा आहेस?? आज वातावरण एकदम बहारदार आहे इथे....तुझ्या आठवणींचा मोहर आज बहरून आलाय. एखादी मस्त रोमँटिक कविता लिहून रिते व्हावे वाटते... माझ्यापेक्षा यात तुझा हातखंडा जास्त आहे...तुझ्या कविता फार बोलक्या असतात.... विषयाचे कोणतेही आढेवेढे न घेता थेट शब्दांनी तू ह्रदयाला स्पर्श करतोस..!

                    सहज विचार आला मनात हा साधेपणा कुठून आणलास या काळात???..... काही म्हण...तुझ्या गावाने तुला दिलेलं सगळ्यात मोठं देणं आहे ते..! तुझ्यासारखे गाव सगळ्यांनाच नसते....माझे बाबा सरकारी नोकरदार असल्याने बाबांची जिथे बदली होईल तेच आमचे गाव..!! त्याकाळी किमान दहा बारा गावं तरी फिरले असेल. यानिमित्ताने गावची संस्कृती जवळून पाहता आली. चाकरमानी माणसे कामाधंद्यासाठी मुंबईत स्थलांतरित झाली....पण सणासुदीला पाय गावाकडे ओढला जातोच. गावच्या जत्रा.....आठवडी बाजार....गावची शाळा.... सवंगडी... शेत....विहीर...चिंचा...बोर...धमाल.. मस्ती.. अशा कितीतरी गमती जमती तुझ्या गावाकडे ही असतील.. मुळात तू जसा आहेस त्यात तुझ्या मातीचा सुगंध दरवळतोच...!

काश तेरे साथ का ये असर होता..
हम सीख पाते हुनर-ए- ईल्म तेरा..
कुछ मासूमियत हम में भी छलकती
कुछ खुशियां हम भी तुम्हें दे पाते..!


               घरी येवून फेसाळलेल्या कॉफीचा कप हातात घेऊन गॅलरीत येवून बसले...तर सायंकाळची आकाशातली केशरी छ्टा.. तुझ्या-माझ्या आठवणींना हिंदकाळत.. मनात रंगांची उधळण करून जात होती...बाहेरचा निसर्ग बघून मनाचं फुलून येणं....झूरू लागलं....मग काय.. पेन आणि कागद यावर आपसूकच भावना उमलून आल्या...!! अगदी खरं सांग.. या समांतर प्रवासाचा काही ठावठिकाणा आहे का??...अविचार....अलौकिक....की.. अनपेक्षित वगैरे...

उत्कटता 

मी मुक्त, अभिव्यक्त होत..
कधी त्याच्या समोर येऊन उभी राहिले,
हे समजलेच नाही..

मात्र उमगत होते मला स्पष्ट
श्वासागणिक वाढत जाणारी त्याची घालमेल..
मुक्ताकाशात विहंग होण्याची त्याची इच्छा 
सर्वार्थाने भावनात्मक संवाद साधत 
विचाराने परिपक्व होत जाण्याचे सामर्थ्य 
अगदी सगळे सगळे...!

हे सर्वकाही नकळत घडत असताना 
त्याची चाहूल दोघांनाही लागली होती..
कारण दोघेही सहप्रवासी एकाच दिशेने जाणारे 
मुक्तीच्या मार्गाने पुढे जात असताना 
एकमेकांत गुंतून राहणे तसेही शक्य नव्हतेच 
आणि हे समजण्या इतपत दोघेही सजग..
तरीही अनामिक ओढ घेऊन आली 
तुझ्या दारापाशी नि तुझ्या निरागस नजरेने 
व्यापून टाकले सर्व भावविश्व..

समोरासमोरच्या शब्द अनुभवातून 
तू कधी जवळीक साधलीस नि 
तो अनुभव इतका शारीरिक होईल..
जो सहज अनुभवत गेलो आपण 
एकमेकांच्या घट्ट मिठीत 
मला सोडवताच आला नाही मोहपाश..
निःशब्द वाहत गेले तुझ्या प्रेमात 
तू साधलेली जवळीक नि दिलेला मायेचा आधार 
तो परिस स्पर्श मी ठरवूनही विसरू शकत नाही.

ते क्षण थबकून तिथेच चिरशांति लाभावी..
इतकी तीव्र इच्छा पूर्वी कधीच न अनुभवलेली 
मृत्यूची सुंदर कल्पना मला सहज स्पर्शून गेली.
तुझी ही आत्माभूती तुझ्यातल्या 
निखळ पुरूषाची ग्वाही देत होती..
जो प्रवाही आहे. 
विचारी आहे.
विवेकी आहे. 
अनमोल आहे.

उत्कटता ही क्षणिक आणि भावनिक असते.
जी अनुभवातून शमते नि 
मुक्तीच्या मार्गावर प्रवाहित होत जाते.

पुन्हा कधीही परतून न येण्यासाठी..!

पुन्हा कधीही परतून न येण्यासाठी..!

               व्यक्त होणं कधीही चांगलेच.. उगाच भावनांची घुसमट करत मनात येणार्‍या विचारांना मुरड घालणे मला पटत नाही.. अगदीच स्वैर व्हावे असेही नाही.. त्यांचा समतोल राखता आला... तरी पुरेसे..! आपल्याला पाहिजे तसे वागता नाही आले तरी व्यक्त मात्र होता आले पाहिजे... तुला काय वाटते???... चूक की बरोबर नाही म्हणत आहे मी. यावर तुला नक्की काय वाटतंय ते सांग. कविता फार ओघवती आहे... माझ्या मनातील तुझ्या बद्दल कधीकाळी आलेल्या उत्कट भावनांचा जेव्हा निचरा झाला... तेव्हा सहज सुचलेले हे शब्द...तुझ्या नदीसारखे... खळाळत वाहत जाणारे...समुद्राच्या ओढीची उत्कटता..!


                                           तुझ्या विचारांत हरवलेली 
                                                        सखी.

      





Comments

  1. Very nice 👌👍🙏

    ReplyDelete
  2. अमर पण कवी आहे तर...☺️
    अमरच्या पत्रानंतर सखी अधिक व्यक्त होऊ लागली आहे.

    उत्कटता अप्रतिम 👌👌

    अमर कसा व्यक्त होईल? सखीला उत्तर देताना त्याच्या भावना कशा असतील? पुढच्या पत्राची प्रतीक्षा

    या पत्रातून दर्जेदार लिखाण वाचायला मिळतंय 😊😊

    ReplyDelete
    Replies
    1. दोघेही शब्द आणि भावनांचे जादूगार आहेत.... अमरला थोडा वेळ द्या.. होईल तोही व्यक्त...प्रवाही

      Delete
  3. अप्रतिम.....

    ReplyDelete
  4. दोन व्यक्तीच्या मनातील उत्कट भाव छटा आणि दोघांच्या ही मनातील अंतरीक एकरूपात्मकतेची भानवा प्रियसीच्या मनोरूपातून प्रतित होत आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. Shanti.. ही भावना फक्त सखीची आहे...अमर ला नक्की काय वाटते हे त्याच्या पत्रात कळले...जी उत्कटता सखी अनुभवते ती तिने तिच्या कवितेत मांडली आहे.

      Delete
  5. काश तेरे साथ का ये असर होता.
    बहोत खूब.
    पहिल्यांदा तर तुला खूप खूप धन्यवाद जो सिलसिला तू सुरू केला आहेस अमर आणि सखी चे रूपाने त्याबद्दल. तुझा सिलसिला प्रत्येक वाचक काल्पनिक रित्या का असेना जगत आहे. आणि तुझ्यापेक्षा आमची उत्कंठा वाढत आहे आणि पुढच्या पत्राची वाट पाहत आहे. आजच्या बद्दल बोलायचं तर, आधी तू थोडा base घेतलास, गाव आणि गावची त्यावेळची संस्कृती जी आपल्या सारख्या पिढीने जगली आहे त्याला आठवणींना थोडा उजाळा मिळाला. त्यानंतर थोडी हिंदी चारोळी आणि तुझी आवडती कॉफी आणि गॅलरी मध्ये बसून हातात पेन घेतलेली तू जशीच्या तशी डोळ्यासमोर येतेस. त्यानंतर तू कवितेला हात घातला.
    कवितेचे शब्द नेहमी सारखे तुझे जितके गुंतावे तितके आणखी खोलवर नेणारे. भावनिक साद, शारीरिक प्रतिसाद, समंज्यास विचार, ती तळमळ, ती घट्ट मिठी, तो मोहपाश सगळे काही न्यारेच. ती शब्द रुपी उत्कटता. व्यक्त व्हावं की राहावं अव्यक्त अश्या आशयाचे चार ओळीच्या माझे लिखाण मी तुला शेअर केले होते तेंव्हा ही तू हेच म्हणाली होतीस. व्यक्त व्हावं घुसमट होण्यापेक्षा. छान व्यक्त झालीस आणि मला ही व्यक्त होण्याची संधी या निमित्ताने भेटली. पुढच्या पात्राच्या प्रतीक्षेत......

    ReplyDelete
    Replies
    1. अनेक धन्यवाद मित्रा....इतक्या सुंदर अभिप्रायाकरिता..! अगदी Facebook ला लिहीत होते तेव्हा पासूनचा माझ्या लिखाणाचा चोखंदळ वाचक तू राहिला आहेस. मध्यंतरी सगळेच थांबले होते. माझे हे असे थांबणे मलाही खटकत होते... पण अनेकदा गोष्टी स्थिर होण्यासाठी वेळ द्यावा लागतो...अनेक वर्षांनी लिहिती झाले आहे...आणि तू म्हणतोस तसे "हम कहा मशहूर होणे के लिये अल्फाज सिंचते है,
      दिल दिमाग से होते हूये वो तो कलम के जरिये कागज पे उतरते है...."

      Thank you.

      Delete
  6. शब्दाची जादू आहे, वेगळ्या जगात नेणारी. मनात ना ठेवता प्रत्येकाने व्यक्त झाला तर जग किती बदलेल.
    अप्रतिम शब्द भावना व्यक्त करणारे. जे बोलता येत नाही ते शब्द रूपाने व्यक्त करणे खूप कठीण आहे.......

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणुनच तर... बर्‍याच वेळा आपल्याला हवे तसे जगता येत नाही.. नसतेच.. पण आपण व्यक्त मात्र नक्कीच होऊ शकतो. बर्‍याचदा माझे व्यक्त होणे हे जे आहे.. घडत आहे.. त्यापेक्षा जास्त उत्कट असते..कारण जे आहे.. जसे आहे तसेच भरभरून जगता आले पाहिजे... आणि शब्दांमध्ये ती ताकद आहे की ते नवीन जग निर्माण करू शकतात... अनेक धन्यवाद!

      Delete
  7. मन शांत व समाधानी असेल तर अश्या आयुष्यातील उत्कट भावना कागदावर उमटतात व लेखकाच्या माध्यामातून आम्हा वाचकांना पुन्हा नव्याने अनुभवता येतात. तुमच्या लेखणीतून आम्हाला अशीच उत्कट भावना अनुभवायला मिळो अशी वाचक म्हणुन आमची माफक अपेक्षा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. वेगवेगळे form हाताळण्यात प्रयत्न करत आहे. तुला पत्रांचा form आवडला हे ऐकून छान वाटले.. आणखी काही लिहिता येतंय का पहाते. वाचत रहा. 😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.