वाचन... ही संस्कृती म्हणून आपणच जोपासली पाहिजे.


वाचन

(Reading)



              शाळा... हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय! आपल्या सर्वांगीण विकासामध्ये शाळेचे योगदान खूप मोठे आहे.

            

              माझे वडील पोलिस खात्यात असल्यामुळे "बदली" हा आम्हा भावंडांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग होता. त्यामुळे आमच्या शालेय जीवनाची सुरुवात शिवाजीनगर, पुणे पहिली ते तीसरी, त्यानंतर विसापूर, अहमदनगर चौथी ते सातवी आणि त्यानंतर चे एम.ए व एल.एल.बी पर्यंतचे माझे शिक्षण मुंबई मध्येच पूर्ण झाले.

         

            मराठी माध्यमातील शाळांमधून माझे दहावी पर्यंतचे शिक्षण झाले...त्यामुळे शाळेतील विविध कार्यक्रम हे माझ्यातील कलागुणांना वाव देणारे ठरले. वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन, गाऊ त्यांची आरती, एकपात्री नाटके अशा अनेक स्पर्धांमुळे "लायब्ररी" हा रोजच्या वेळापत्रकातील आवडीचा तास बनला... शाळा सुटली तरी तासभर आम्ही भावंडे Library मध्ये रेंगाळत असू. माझ्या लहान बहिणीचा तसा पुस्तकांशी विशेष संपर्क आला नाही... पण वनराज आणि माझ्या मध्ये असल्याने काही ना काही कारणाने पुस्तके तिच्या हातात पडत होती.

       

            अशी आमच्या वाचनाची सुरुवात झाली....!!

      

            मित्रमंडळी....यांच्यामुळे तुमच्यातील वाचनाची गोडी टिकून रहाते. चांगले मित्र हे चांगल्या पुस्तकांप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करतात. 'College life' ही सर्वांचीच वेगवेगळ्या कारणाने बहारदार असते...माझ्या बाबतीत ती माझ्या मित्र मैत्रिणींमुळे खुलत गेली. माझी वैचारिक बैठक बसण्यात माझे कॉलेजचे प्राध्यापक आणि मित्रमंडळी यांचा खूप मोठा हातभार आहे.

 

               College ची Library ही अनेक कारणांनी तरुणांच्या आयुष्यातील एक खास जागा असते... अर्ध्या अधिक कॉलेज तरुणांना त्यांचे पहिले प्रेम Library मधेच होते...लपूनछपून गप्पा मारणं, खाणाखुणा करत.. पुस्तक वाचण्यापेक्षा त्याच्या आडून बोलण्यात जी मजा...ती फक्त कॉलेज च्या Library मध्येच..!!

      

              बी.ए करत असताना प्रा. नितीन रींढे सर हे आम्हाला मराठी साहित्य शिकवायला होते....त्यांनी एकदा त्यांच्या वैयक्तिक पुस्तक संग्रहातून मला वाचनासाठी दिलेले पहिले पुस्तक म्हणजे भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी 'कोसला '...!! एका बैठकीत वाचलेले हे पहिले पुस्तक... आणि त्यानंतर मी नेमाड्यांच्या सगळ्या कादंबर्‍या वाचून काढल्या. रींढे सर यांनी मराठी साहित्याची गोडी इतकी लावली....की एम.ए करताना दुसरा कोणताच विषय डोक्यात आला नाही.

         

             मुंबई विद्यापीठामध्ये एम. ए. करिता मराठी साहित्य हा विषय घेतला. सदरवेळी मला डॉ हरिश्चंद्र थोरात हे प्राध्यापक शिकवायला होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाने मी फारच प्रभावित झाले होते.... थोरात सर यांनी माझ्यावर लिखाणाचे संस्कार केले. समीक्षक म्हणुन साहित्य क्षेत्रात त्यांचे खूप नाव आहे. 

     

            मुंबई विद्यापीठाचा एकंदरीत परिसर हा अतिशय positive vibes देणारा आहे. अभ्यास न आवडणारी व्यक्ती देखील येथे सहज रमू शकते. मुंबई विद्यापीठाची Library देखील तितकीच भव्य व हजारो पुस्तकांची तेथे मेजवानी आहे. 

    

           मुंबई विद्यापीठ हा माझ्या वाचनाचा सगळ्यात सुंदर काळ ठरला...हिंदी, मराठी, English असे विविध भाषेतील साहित्य माझ्या वाचनात येऊ लागले...आणि सर्वांगाने गोष्टी समजून घेण्याची समज माझी या काळात वाढत गेली.

     

            वरील शैक्षणिक वर्षांनमधील वळणावळणांनी माझ्यातील वाचनाची आवड...सवय वाढतच गेली... चांगले शिक्षक आणि मित्र हे आपल्या जीवनाला कलाटणी देणारे ठरू शकतात.

        

           पुस्तकं ही चांगल्या मित्रासारखीच असतात... वेळ पडेल तेव्हा ती मार्गदर्शक ठरतात.... ते सोबत असताना एकटेपणा तुमच्या मनाला शिवतही नाही.

      

            मित्रांनो.. तुम्हीही तुमच्या वाचनाची आवड जोपासा. कोणत्याही वैयक्तिक कारणांमुळे वाचन थांबले असेल तर ते पुन्हा सुरू करा... आपल्या अनेक गोष्टींसाठी वाचन हा उत्तम पर्याय आहे.


      ( तुम्ही सध्या वाचत असलेल्या पुस्तकाविषयी दोन ओळी नक्कीच comment मध्ये लिहून कळवा. )

          मी वाचत असलेल्या पुस्तकाविषयी थोडक्यात विवेचन लवकरच लिहून तुमच्या सोबत share करेल.


धन्यवाद...!!


         








Comments

  1. पुस्तकं ही चांगल्या मित्रासारखीच असतात... वेळ पडेल तेव्हा ती मार्गदर्शक ठरतात.... ते सोबत असताना एकटेपणा तुमच्या मनाला शिवतही नाही.

    पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही.

    खूप छान मॅडम... नक्कीच! तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकाचं विवेचन शेअर करा.

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद! आपला अभिप्राय असाच देत रहा.

    ReplyDelete
  3. तुमच्यातील लिखाणाची प्रतिभा आणि सर्जनशीलता ही वाचनामुळेच आली आहे. हे खरंय की पुस्तकं एका चांगल्या मित्रासारखी असतात. पुस्तकं मार्गदर्शन करतात, दिशा दाखवतात, प्रेरणा देतात जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन तयार करतात. कोसला पुस्तक सुध्दा नेमाडे यांनी १३ दिवसांत लिहून पूर्ण केले होते. तुम्ही पोलीस खात्यासारख्या व्यस्त पेशात असूनही वाचायला वेळ काढता ही सर्वांसाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे. वेळ नसल्याचा बाऊ करणार्‍यांना तुमचं उदाहरण आदर्श ठरेल.

    मागील वर्षात मी विविधांगी पुस्तकं वाचली आणि ती आत्मसात केली याचा आनंद आहे. या वर्षातही विविधांगी आणि भरपूर पुस्तकं वाचण्याचा मनोदय आहे. या वर्षाची सुरवात वैचारिक पुस्तकांनी करण्याचा विचार केला. महापुरूषांना नव्याने खर्‍या अर्थाने जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी धनंजय किर यांनी लिहिलेले महात्मा फुले यांचे चरित्र वाचतोय.. व्हॉटसअप विद्यापीठातील अर्धवट ज्ञानाने समाज कलुषित झाला आहे. त्यासाठी खरी आणि अधिकृत माहिती अशा पुस्तकांने मिळते. किर यांनी लिहिलेले पुस्तक सोप्पे आहे. पुढील आठवड्याभरात पूर्ण होईल

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद सुहास..! आपल्या धकाधकीच्या आयुष्यात पुस्तके कधी कधी सुटून जातात, परंतु पुन्हा त्यांना आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवणे महत्वाचे. तुम्ही पत्रकार आहात त्यामुळे वाचन आणि लिखाण हा तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे..! तुमचे शब्द मला माझे वाचन अविरत सुरू ठेवण्यात नक्कीच प्रेरणादायी ठरतील.

      Delete
    2. तुमच्या आवडीच्या पुस्तकांबद्दल जाणून घ्यायला आवडेल

      Delete
  4. महात्मा फुले हे एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व आहे.. त्यांनी लिहिलेले शेतकर्‍यांचा आसूड वाचते आहे.

    ReplyDelete
  5. वाह! मी मागील महिन्यात वाचलं.

    ReplyDelete
  6. जय हिंद.. एकदम मस्त सर्व लिहले आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.